भारतात इंग्रजी सत्तेची स्थापना आणि विस्तार

 

भारतात इंग्रजी सत्तेची स्थापना आणि विस्तार

भारतात इंग्रजी सत्तेची स्थापना आणि विस्तार

वास्को-द-गामा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत येथे

येऊन पोहोचला. त्यानंतर सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस पोर्तुगिजांनी

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आपली सत्ता स्थिर केली. सतराव्या

शतकात डच, इंग्रज व फ्रेंच व्यापारी भारतात आले. त्या वेळी भारतात

मुघलांची प्रबळ सत्ता अस्तित्वात होती. या पार्श्वभूमीवर भारतातील

इंग्रजी सत्तेची स्थापना आणि विस्तार यांची माहिती आपण घेऊया.

युरोपीय व्यापाऱ्यांच्या प्रारंभिक हालचाली : सुरुवातीस

युरोपीय व्यापारी मुघल सम्राटाकडून परवाने मिळवून शांततेने व्यापार करत

असत. व्यापाराच्या सोईसाठी पोर्तुगीज, डच, इंग्लिश व फ्रेंच व्यापारी

कंपन्यांनी भारतात आपली व्यापारी ठाणी स्थापन केली. अशा ठाण्यास

वखार' म्हणतात. औरंगजेब बादशाहाच्या मृत्यूनंतर मुघल सत्तेला

इंग्रजांची वखारउतरती कळा लागली. मुघल साम्राज्याचे सुभेदार स्वतंत्रपणे वागू लागले.

देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली. त्याचा फायदा युरोपीय

व्यापाऱ्यांनी घेतला.

 

इंग्रज-फ्रेंच संघर्ष : भारतात व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी

परकीय सत्तांमध्ये अटीतटीची स्पर्धा होती. अठराव्या शतकात

कर्नाटकच्या नवाबपदासाठी भारतीय सत्ताधीशांमध्ये तंटा सुरू झाला.

कर्नाटकच्या राजकारणात चंचुप्रवेश करण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे

फ्रेंचांनी व इंग्रजांनी ओळखले. नवाबपद मिळवण्यासाठी उत्सुक

असलेल्या एका स्पर्धकाला फ्रेंचांनी, तर त्याच्या विरोधकाला इंग्रजांनी

लष्करी मदत दिली. या स्पर्धेमुळे इंग्रज व फ्रेंच यांच्यात तीन युद्धे

झाली. ती ‘कर्नाटक युद्धे' म्हणून ओळखली जातात. तिसऱ्या युद्धात

इंग्रजांनी फ्रेंचांचा पराभव केला. त्यामुळे इंग्रजांना भारतात प्रबळ युरोपीय

स्पर्धक उरला नाही.

 

बंगालमधील राजकीय घडामोडी : बंगालमध्ये इंग्रज व फ्रेंच

व्यापारी त्यांना मिळालेल्या व्यापारी सवलतींचा गैरवापर करू लागले.

सिराज उद्दौला या बंगालच्या नवाबाची परवानगी न घेता इंग्रजांनी

आपल्या वखारींभोवती तटबंदी उभारली. यातूनच सिराज उद्दौला व

इंग्रज यांच्यात संघर्ष सुरू झाला. १७५७ मध्ये प्लासी येथे लढाई झाली.

मीर जाफर या सेनापतीला नवाबपदाचे आमिष दाखवून इंग्रजांनी

आपल्याकडे वळवून घेतले. त्याच्या नेतृत्वाखालील नवाबाचे लष्कर

युद्धात उतरलेच नाही. नवाबाला नाइलाजाने माघार घ्यावी लागली.

अशा प्रकारे शस्त्रबळाचा वापर न करता इंग्रजांनी फंदफितुरीने प्लासीची

लढाई जिंकली.

इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब बनला, पण पुढे

त्याने विरोध करताच इंग्रजांनी त्याचा जावई मीर कासीम याला नवाब

बनवले. इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न मीर

कासीमने केला, तेव्हा इंग्रजांनी मीर जाफरला पुन्हा नवाबपद दिले.

बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी अयोध्येचा

नवाब शुजा उद्दौला, मीर कासीम व मुघल बादशाह शाहआलम यांनी एकत्र

मोहीम काढली. १७६४ साली बिहारमधील बक्सार येथे युद्ध झाले. त्यात

इंग्रजांना विजय मिळाला. या लढाईनंतर अलाहाबादचा तह झाला. या

तहान्वये बंगालच्या सुभ्यात महसूल गोळा करण्याचा अधिकार इंग्रजांनी

मिळवला. याला ‘दिवाणी अधिकार' असे म्हणतात. अशा प्रकारे

भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला.

 

इंग्रज-म्हैसूर संघर्ष : म्हैसूरचे शासक व इंग्रज यांच्यात चार युद्धे

झाली. म्हैसूरच्या हैदरअलीच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र टिपू सुलतान याने

इंग्रजांविरुद्धची मोहीम नेटाने चालू ठेवली. १७९९ मध्ये श्रीरंगपट्टणच्या

लढाईत टिपू धारातीर्थी पडला. त्यामुळे म्हैसूरचे राज्य इंग्रजांच्या वर्चस्वाखाली

आले.

 

इंग्रज व मराठे : मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख

केंद्र होते. त्याच्या जवळपासचा प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता;

परंतु या प्रदेशावर मराठ्यांची घट्ट पकड होती. माधवराव पेशवे यांच्या

मृत्यूनंतर रघुनाथरावाने पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत

मागितली. त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला.

१७७४ ते १८१८ या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात तीन युद्धे

झाली. पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले.

त्यामुळे मराठ्यांची सरशी झाली. १७८२ साली सालबाईचा तह होऊन

पहिले इंग्रज-मराठा युद्ध संपले.

 

तैनाती फौज : १७९८ मध्ये लॉर्ड वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून

भारतात आला. सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्याचे

धोरण होते. त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचे

करार केले. या करारांन्वये भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी

मदतीचे आश्वासन देण्यात आले, मात्र त्यासाठी काही अटी घातल्या.

भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे, त्या

लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश

कंपनीला तोडून दयावा, त्यांनी इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीनेच

संबंध ठेवावे, आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट (प्रतिनिधी) ठेवावा अशा

त्या अटी होत्या. भारतातील काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली

व आपले स्वातंत्र्य गमावले.

१८०२ मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा

करार केला. हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे; परंतु हा तह काही

मराठा सरदारांना मान्य नव्हता. त्यामुळे दुसरे इंग्रज-मराठा युद्ध झाले.

त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढू लागला. तो

असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. या युद्धात

त्याचा पराभव झाला. १८१८ मध्ये त्याने शरणागती पत्करली.

 

सिंधवर इंग्रजांचा ताबा : भारतातील आपली सत्ता सुरक्षित

करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे वळले. रशिया भारतावर

अफगाणिस्तानातून आक्रमण करेल अशी त्यांना भीती होती, म्हणून

इंग्रजांनी अफगाणिस्तानवर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचे ठरवले.

अफगाणिस्तानकडे जाणारे मार्ग सिंधमधून जात होते. यामुळे सिंधचे

महत्त्व इंग्रजांच्या ध्यानात आले आणि १८४३ साली त्यांनी सिंध

गिळंकृत केला.

 

शीख सत्तेचा पाडाव : एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी

पंजाबमधील शीख राज्याची सत्ता रणजितसिंहाच्या हाती होती.

रणजितसिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा दलीपसिंग गादीवर

बसला. त्याच्या वतीने त्याची आई राणी जिंदन राज्याचा कारभार पाहू

लागली, मात्र सरदारांवर तिचा अंकुश राहिला नाही. ही संधी साधून

इंग्रजांनी काही शीख सरदारांना फितूर केले. इंग्रज पंजाबवर आक्रमण

करणार, असा शिखांचा समज झाल्यामुळे त्यांनी इंग्रजांवर हल्ला

केला. या पहिल्या शीख-इंग्रज युद्धात शिखांचा पराभव झाला.

 

रणजितसिंह

दलीपसिंगाला इंग्रजांनी गादीवर कायम ठेवले. पंजाबवरील इंग्रजांचा

वाढता प्रभाव काही स्वातंत्र्यप्रिय शिखांना जाचू लागला. मुलतानचा

अधिकारी मूलराज याने इंग्रजांविरुद्ध बंड केले. हजारो शीख सैनिक

इंग्रजांविरुद्ध युद्धात उतरले. या दुसऱ्या युद्धातही शीख पराभूत झाले.

१८४९ मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला.

अशा प्रकारे देशी सत्तांना निष्प्रभ करून इंग्रजांनी भारतात आपले

वर्चस्व प्रस्थापित केले.