प्रबोधनयुग

 

प्रबोधनयुग

प्रबोधनयुग

मागील वर्षी आपण मध्ययुगीन काळातील भारताच्या इतिहासाचा

अभ्यास केला. या वर्षी आपण आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास

करणार आहोत. जगाच्या इतिहासातील काही महत्त्वपूर्ण घडामोडींचा

आधुनिक भारताच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा आहे. अशा काही

घटनांची आपण ओळख करून घेऊया.

 

प्रबोधनयुग : युरोपमध्ये मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यात

(इ.स. १३ वे शतक ते १६ वे शतक) प्रबोधन, भौगोलिक शोध व

धर्मसुधारणेची चळवळ या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला

गेला. या काळाला 'प्रबोधनयुग' असे म्हणतात.

या काळात कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रांमध्ये प्राचीन

ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले, मात्र प्रबोधन म्हणजे

केवळ प्राचीन परंपरांचे पुनरुज्जीवन नव्हते. प्रबोधनाने सर्वांगीण प्रगतीला

चालना दिली आणि जगाच्या इतिहासात नवयुग आणले.

प्रबोधनाची सुरुवात : मध्ययुगीन युरोपवर धर्माचा जबरदस्त

पगडा होता. तेराव्या शतकापासून सर्व क्षेत्रांमध्ये बदल जाणवायला

लागले. इटली हा देश या बदलाचा केंद्रबिंदू होता. इटलीतील दर्यावर्दी

आशिया आणि युरोपातील देशांशी व्यापार करू लागले. या व्यापारामुळे

इटलीमध्ये समृद्ध नगरे विकसित झाली, तसेच व्यापारी वर्ग उदयाला

आला. या वर्गाने कलांना आश्रय दिला.

 

प्रबोधनाचे स्वरूप : प्रबोधनाचे सर्वांत महत्त्वाचे मूल्य म्हणजे

मानवतावाद. या काळात माणसाचा माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन

बदलला. माणूस हा सर्वांत बुद्धिमान प्राणी आहे; बरे-वाईट, योग्य-

अयोग्य याचा न्यायनिवाडा करणारी विवेकबुद्धी त्याच्याकडे असते;

माणसाला भावभावना, इच्छा असणे हे स्वाभाविक आहे; माणूस स्वतः

आपल्या जीवनाचा शिल्पकार असतो, असा माणसाबद्दलचा नवा

विश्वास निर्माण झाला. माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू बनला.

प्रबोधन ही जीवनाच्या सर्व क्षेत्रांना व्यापून टाकणारी एक व्यापक

चळवळ होती. तत्त्वज्ञान, साहित्य, विज्ञान, संगीत, शिल्प, चित्रकला,

स्थापत्य इत्यादी क्षेत्रांमध्ये तिचा आविष्कार झाला. या सर्व क्षेत्रांमध्ये

नव्या कलाकृती निर्माण झाल्या. नव्या शैली विकसित झाल्या.

प्रबोधनकाळात कला आणि साहित्यातून मानवी भावभावना, सुखदुःख,

आनंद यांचे चित्रण होऊ लागले. लोकांना समजेल अशा प्रादेशिक

भाषांमधून साहित्य निर्माण होऊ लागले. पूर्वी पुस्तके हस्तलिखित असत.

इ. स. १४५० च्या सुमारास छपाईयंत्राचा शोध लागला. त्यामुळे नवे

विचार, नव्या संकल्पना व ज्ञान समाजात सर्वांपर्यंत नेणे शक्य झाले.

प्रबोधनकालीन प्रगतीची कल्पना लिओनार्डो-द-व्हिन्सीच्या

उदाहरणावरून येऊ शकते. अनेक कला व शास्त्रे लिओनार्डोला अवगत

होती. तो चित्रकार होता, तसेच तो शिल्पकार, स्थापत्यकार व अभियंता

होता. त्याला संगीताची उत्तम जाण होती. तो गणितज्ञ होता.

खगोलशास्त्रज्ञही होता. माणसाच्या बौद्धिक आवाक्याला व

आविष्काराला मर्यादा नाहीत, असे लिओनार्डोच्या चरित्रावरून जाणवते.

शेक्सपिअरसारखा थोर नाटककार आणि कोपर्निकस, गॅलिलिओ यांसारखे

थोर शास्त्रज्ञ प्रबोधनयुगात होऊन गेले.

 

नव्या विज्ञानाची पहाट : परंपरागत ज्ञान, अंधश्रद्धा, रूढी-

परंपरा इत्यादींना प्रबोधनकाळात आव्हान दिले जाऊ लागले. ज्ञानाच्या

निर्मितीसाठी माणूस आता ज्ञानेंद्रियांचा अधिक जाणीवपूर्वक उपयोग करू

लागला. निरीक्षणशक्ती आणि प्रयोगशीलता यांच्या आधारे निसर्गातील

गूढ ज्ञानाची उकल वैज्ञानिक करू लागले. पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र,

खगोलशास्त्र इत्यादी ज्ञानशाखा विकसित झाल्या.

 

धर्मसुधारणा चळवळ

 

स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंतांनी जुन्या धार्मिक कल्पनांवरही हल्ला चढवला. लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन धर्मगुरू कर्मकांडाचे स्तोम माजवत. धर्माच्या

नावावर त्यांना लुबाडत असत. याविरुद्ध युरोपात जी चळवळ झाली,

तिला 'धर्मसुधारणा चळवळ' असे म्हणतात.

 

धर्मसंस्थेतील अनिष्ट प्रवृत्ती, धर्मगुरूंचे दांभिक वर्तन यांवर

विक्लिफ, इरॅस्मस, केल्व्हिन इत्यादी विचारवंतांनी जोरदार टीका केली.

'बायबल' हा ख्रिस्ती धर्मग्रंथ लॅटिन भाषेत होता. ती भाषा सर्वसामान्य

लोकांना नसे. समजत

धर्मसुधारणा चळवळीच्या काळात 'बायबल'ची भाषांतरे इंग्रजी,

फ्रेंच अशा लोकभाषांमध्ये केली गेली. बायबलमधील शिकवण

आणि रोमन कॅथलिक चर्चची शिकवण यांमध्ये लोकांना खूपच

तफावत आढळली. कॅथलिक चर्चमधील प्रचलित दोषांचा

मार्टिन ल्यूथरने निषेध (प्रोटेस्ट) केला, म्हणून त्याच्या अनुयायांना

प्रोटेस्टंट' असे नाव पडले. मूळच्या रोमन कॅथलिक पंथाच्या जोडीला

प्रोटेस्टंट हा नवा ख्रिस्ती धर्मपंथ उदयाला आला.

 धर्मसुधारणा चळवळ युरोपातील अनेक देशांमध्ये पसरली.

नवोदित मध्यमवर्गाने धर्मसुधारणा चळवळीला पाठिंबा दिला. या

चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य या

तत्त्वांना महत्त्व प्राप्त झाले.

 

भौगोलिक शोध : इसवी सनाच्या पंधराव्या शतकापर्यंत युरोपीय

लोक पूर्वेकडील देशांमधून आयात केलेले मसाल्याचे पदार्थ, साखर,

रेशीम, कापड, मौल्यवान वस्तू वापरत असत, मात्र त्यामध्ये अडथळा

निर्माण झाला, कारण इ. स. १४५३ मध्ये ऑटोमन तुर्कांनी

कॉन्स्टॅन्टिनोपल (इस्तंबूल) जिंकून घेतले. हे शहर म्हणजे बायझन्टाइन

साम्राज्याची (पूर्वेकडील रोमन साम्राज्याची ) राजधानी होती. तुर्कांनी

त्यांच्या साम्राज्यातून जाणारे खुष्कीचे मार्ग म्हणजेच भूमार्ग रोखून धरले.

त्यामुळे पूर्वेकडील देशांकडे जाण्यासाठी युरोपला आता नवे मार्ग शोधणे

आवश्यक झाले.

 

 

बार्थोलोम्यू डायस हा पोर्तुगीज खलाशी भारताच्या शोधात

आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला. या टोकाला 'आशेचे भूशिर'

(Cape of Good Hope) हे नाव मिळाले. भारताच्या शोधात निघालेला

कोलंबस एका किनाऱ्याजवळ जाऊन पोहोचला. आपण भारतात उतरलो

आहोत, असा त्याचा गैरसमज झाला. पुढे इटालियन खलाशी अमेरिगो

व्हेस्पुसी हा कोलंबसच्या मार्गानेच त्या किनाऱ्यावर पोहोचला. हा भारताचा

किनारा नाही, हे त्याच्यामुळे लक्षात आले. या अज्ञात प्रदेशाला अमेरिगोच्या

नावावरून ‘अमेरिका' हे नाव प्राप्त झाले. वास्को-द-गामा या पोर्तुगीज

खलाश्याने १४९८ मध्ये भारताकडे येण्याचा सागरी मार्ग शोधला.

१५१९ साली फर्डिनांड मॅगेलन हा पोर्तुगीज खलाशी पृथ्वी

प्रदक्षिणा करण्याच्या ईर्षेने सागरी सफरीवर निघाला. ही प्रदक्षिणा पूर्ण

होण्याच्या आधी तो चकमकीत मारला गेला, तरी त्याच्या सहकाऱ्यांनी

ही पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली. जगाच्या इतिहासातील ही पहिली सागरी

पृथ्वी प्रदक्षिणा होय.

 प्रबोधनयुग

भौगोलिक शोधांचे परिणाम : युरोपातून पूर्वेकडे जाणाऱ्या नव्या

मार्गांमुळे युरोपचा आशिया व आफ्रिका खंडांशी असलेला व्यापार

भरभराटीला आला. सुरुवातीला पोर्तुगाल व स्पेन हे देश या व्यापारात

आघाडीवर होते. पुढे इंग्लंड, फ्रान्स, हॉलंड इत्यादी युरोपीय देशांमध्ये

व्यापारी स्पर्धा सुरू झाली. आपले राष्ट्र सधन व्हायचे असेल, तर

राजसत्तेने आपल्या देशातील व्यापाराला व उद्योगांना संरक्षण दिले

पाहिजे, अशी धारणा त्या काळात बळकट होऊ लागली. या आर्थिक

धोरणाला ‘व्यापारवाद’ असे म्हटले जाते. युरोपीय व्यापारी त्यांचा नफा

नव्या उद्योगांमध्ये गुंतवू लागले. व्यापारासाठी लागणारे भांडवल

एकत्रितपणे उभारू लागले. यातून व्यापारी कंपन्यांची स्थापना होऊ

लागली. भारतात आलेली ईस्ट इंडिया कंपनी ही अशीच व्यापारी कंपनी

होती. व्यापारवाढीचा परिणाम म्हणून पतपेढीवाले, दलाल, दुकानदार,

लिपिक, हिशेबनीस यांचा एक नवा वर्ग उदयाला आला. हा 'मध्यमवर्ग'

म्हणून ओळखला गेला.

युरोपातील राष्ट्रांनी अमेरिका, आशिया, आफ्रिका व ऑस्ट्रेलिया

खंडांतील देशांमध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या. युरोपीय व्यापारी

वसाहतींमधून कमी किमतीला माल खरेदी करत. तो माल ते युरोपमध्ये

जास्त किमतीला विकत असत. वसाहतींचे अधिक पद्धतशीरपणे

आर्थिक शोषण करता यावे, म्हणून तेथे त्यांनी सत्ता बळकावली. या

धोरणाला ‘वसाहतवाद' असे म्हणतात.