१८५७ चा स्वातंत्र्यलढा
१८५७ च्या लढ्याची व्याप्ती आणि त्यामागची भूमिका लक्षात घेऊन त्याला 'स्वातंत्र्यसमर' हे नाव
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
यांनी दिले. सावरकरांनी ज्या
पुस्तकातून ही मांडणी केली त्या '१८५७ चे
स्वातंत्र्यसमर' या पुस्तकाने
अनेक क्रांतिकारकांना
ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली.
१८५७ पूर्वीचे लढे : भारतात ज्या ज्या
भागात इंग्रजांची सत्ता
स्थापन झाली, तेथील लोकांना
इंग्रज शासनाचे दुष्परिणाम भोगावे
लागले. त्यामुळे त्यांनी इंग्रजांच्या
विरोधात लढे दिले. शेतकरी, कारागीर,
आदिवासी, फकीर, सैनिक अशा विविध
गटांनी हे लढे दिले.
कंपनी सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे
शोषण झाले. त्यामुळे
शेतकरी वर्गात असंतोष निर्माण झाला.
सन १७६३ ते १८५७ या काळात
बंगालमध्ये प्रथम संन्याशांच्या व
त्यानंतर फकिरांच्या नेतृत्वाखाली
शेतकऱ्यांनी लढे दिले. असेच लढे
गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र व
दक्षिण भारतातही झाले.
भारतातील आदिवासी व वन्य जमातींनीही
इंग्रज सत्तेला आव्हान
दिले. जंगल संपत्तीवर उदरनिर्वाह
करण्याच्या त्यांच्या हक्कांवर
ब्रिटिशांच्या कायदयांनी गदा आणली.
छोटा नागपूर परिसरातील
कोलाम, उडीसातील गोंड, महाराष्ट्रातील
कोळी, भिल्ल, रामोशी यांनी
इंग्रजांविरुद्ध लढे दिले. बिहारमध्ये
संथाळांनी फार मोठ्या प्रमाणावर
लढा दिला. हा लढा दडपण्यासाठी
इंग्रजांना अनेक वर्षे लष्करी मोहिमा
कराव्या लागल्या. महाराष्ट्रात उमाजी
नाईक यांनी केलेला लढाही असाच
उग्र होता. उमाजींनी आपल्या रामोशी
बांधवांना व स्थानिक युवकांना
संघटित करून इंग्रजांविरुद्ध बंड
केले. त्यांनी एक जाहीरनामा काढून
इंग्रजांविरुद्ध लढा देण्याचे व
इंग्रजी सत्ता झुगारून देण्याचे आवाहन
केले. १८३२ साली त्यांना फाशी देण्यात
आले.
कोल्हापूर परिसरात गडकऱ्यांनी व
कोकणात फोंड- सावंतांनी
इंग्रजांविरुद्ध लढे दिले.
इंग्रजांच्या दडपशाहीविरुद्ध १८५७ सालापूर्वी
देशाच्या निरनिराळ्या भागांत काही
जमीनदार आणि राजेरजवाड्यांनीही
लढे दिले. इंग्रजांच्या लष्करातील हिंदी शिपायांनीदेखील आपल्या
अधिकाऱ्यांविरुद्ध वेळोवेळी लढे दिले
होते. त्यांपैकी १८०६ सालचा
वेल्लोर येथील तसेच १८२४ सालचा
बराकपूर येथील लढा, असे दोन्ही
लढे विशेष उग्र स्वरूपाचे होते.
इंग्रजांच्या विरोधी झालेले हे सर्व
लढे स्थानिक स्वरूपाचे व एकाकी
असल्यामुळे इंग्रजांनी ते मोडून काढले
हे खरे; परंतु त्यामुळे लोकांमधील
असंतोष फक्त दडपला गेला. तो नाहीसा
झाला नाही, मात्र जनतेतील
असंतोषाचा वणवा १८५७ मध्ये भडकला.
दारूच्या कोठारावर ठिणगी
पडावी तसे १८५७ साली घडले आणि
भारतातील भिन्न वर्गांमध्ये साचत
गेलेल्या इंग्रजविरोधी असंतोषाचा
उद्रेक अभूतपूर्व अशा लढ्याने झाला.
१८५७ च्या लढ्याची कारणे :
इंग्रजपूर्व काळात भारतात राजवट
बदलली तरी गावगाडा पूर्वीसारखा चालू
राही. इंग्रजांनी मात्र प्रचलित
व्यवस्था मोडून नवीन व्यवस्था
अस्तित्वात आणली. त्यामुळे भारतीयांच्या
मनात अस्थिरतेची व असुरक्षिततेची
भावना निर्माण झाली व वाढत गेली.
आर्थिक कारणे : इंग्रजांनी सुरू
केलेल्या नव्या महसूल पद्धतीमुळे
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली.
इंग्रजांच्या व्यापारी धोरणामुळे
भारतातील उदयोगधंदयांचा -हास झाला.
त्यामुळे अनेक कारागीर बेकार
झाले. त्यांच्या मनात इंग्रजविरोधी
भावना बळावली. तसेच जी संस्थाने
इंग्रजांनी ताब्यात घेतली, तेथील सैनिक बेकार
झाले व तेही इंग्रजांचे
विरोधक बनले.
सामाजिक कारणे : भारतीय समाजातील अनेक
परंपरागत
चालीरीती व रूढी यांत इंग्रज शासकांनी
हस्तक्षेप केला. त्यांनी सतीबंदीचा
कायदा, विधवा विवाहविषयक कायदा असे कायदे
केले. असे कायदे
करून परकीय सरकार आपली जीवनपद्धती
मोडू पाहत आहे, असा
लोकांचा समज झाला. त्यामुळे ते
असंतुष्ट बनले.
राजकीय कारणे : १७५७ सालापासून
इंग्रजांनी अनेक भारतीय
राज्ये नष्ट केली होती. सन १८४८ ते
१८५६ या दरम्यान लॉर्ड डलहौसी
याने अनेक संस्थाने खालसा केली.
गैरकारभाराची सबब पुढे करून
त्याने अयोध्येच्या नवाबाला पदच्युत
केले. त्याचे संस्थान ताब्यात
घेतले. सातारा, झाशी, नागपूर इत्यादी
काही संस्थाने तेथील राजांच्या
दत्तकपुत्रांचा वारसाहक्क नामंजूर
करून खालसा केली. काही पदच्युत
राजांच्या वारसदारांचे तनखे रद्द
केले. त्यामुळे त्यांच्यात तीव्र असंतोष
पसरला.
हिंदी सैनिकांतील असंतोष : हिंदी सैनिकांना
इंग्रज अधिकारी
तुच्छतेने वागवत. सैन्यात
सुभेदारपदापेक्षा वरचे पद त्यांना दिले जात
नसे. गोऱ्या सैनिकांपेक्षा त्यांचा
पगार कमी असे. त्यांना सुरुवातीला दिले
जाणारे भत्तेही इंग्रजांनी हळूहळू कमी
केले. अशा अनेक कारणांमुळे हिंदी
सैनिकांत असंतोष साचत गेला.
तात्कालिक कारण : इंग्रजांनी १८५६
साली हिंदी सैनिकांच्या
हाती लांब पल्ल्याच्या एन्फिल्ड
बंदुका दिल्या. त्यात वापरण्यासाठी
नवी काडतुसे दिली. त्या काडतुसांवरील
आवरण दातांनी तोडावे लागे.
काडतुसांवरील आवरणाला गाईची किंवा
डुकराची चरबी लावलेली
असते, अशी बातमी पसरली. त्यामुळे
हिंदू-मुस्लिमांच्या धार्मिक भावना
दुखावल्या आणि सैनिकांमध्ये असंतोष
पसरला.
वणवा पेटला :
२९ मार्च १८५७ रोजी पहिला भडका बराकपूर येथील लष्करी छावणीत उडाला.
काडतुसे वापरण्याची सक्ती करणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यावर मंगल पांडे
यांनी गोळी झाडली. त्यांना अटक करून फाशी दिले गेले. ही बातमी
देशातील इतर लष्करी छावण्यांमध्ये वणव्यासारखी पसरली. १० मे १८५७
रोजी मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांची
पूर्ण पलटणच बंड करून उठली.
सैनिकांनी दिल्लीकडे कूच केले. वाटेत
हजारो सामान्य नागरिक त्यांना
सामील झाले. दिल्ली पोचताच तेथील
इंग्रजांच्या छावणीतील हिंदी
शिपाई त्यांना येऊन मिळाले. त्यांनी
मुघल बादशहा बहादुरशाहा जफर
यांच्याकडे लढ्याचे नेतृत्व दिले.
भारताचा सम्राट म्हणून त्यांच्या नावाने
द्वाही फिरवण्यात आली.
लढ्याची व्याप्ती : पाहता पाहता
लढ्याचे लोण उत्तर भारतभर
पसरले. बिहारपासून
राजपुतान्यापर्यंतच्या इंग्रज छावण्यांतील हिंदी
सैनिकांनी बंडाचे निशाण उभारले.
त्यांना अनेक लोक येऊन मिळाले.
मे महिन्यात लढ्याला सुरुवात
झाल्यानंतरच्या तीन-चार महिन्यांत पूर्व
जिल्ह्यातील संगमनेरजवळील भागोजी नाईक
इत्यादी या लढ्यात
अग्रभागी होते. नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाण्याच्या
राणीसारख्या
स्त्रियाही त्यात सामील झाल्या.
१८५७ साली खानदेशात कजारसिंग यांच्या
नेतृत्वाखाली झालेले
भिल्लांचे लढे व सातपुडा भागात
शंकरशाहांच्या नेतृत्वाखालील स्थानिक
लढे इंग्रजांनी चिरडून टाकले.
खानदेशातील लढ्यात सुमारे ४०० भिल्ल
स्त्रिया सहभागी झाल्या होत्या.
लढ्याचे नेतृत्व : मुघल साम्राज्य
दुबळे झाल्यानंतर नादिरशाह,
अब्दालीसारख्या परकीयांनी
हिंदुस्थानवर आक्रमण करावयास सुरुवात
केली. मुघल साम्राज्य त्यांना
प्रतिकार करू शकत नाही हे लक्षात
आल्यानंतर मराठ्यांनी परकीय
आक्रमणापासून हिंदुस्थानच्या रक्षणाची
जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. त्याच
भूमिकेतून मराठे अब्दाली
विरुद्ध पानिपतावर लढले. १८५७ च्या
स्वातंत्र्यलढ्यात दुबळ्या मुघल
साम्राज्याचा वारसदार बहादुरशाहा
इंग्रजांविरुद्ध लढण्यास असमर्थ आहे.
हे लक्षात आल्यानंतर बहादरशाहाचे
नेतृत्व मान्य करून नानासाहेब पेशवे.
झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांनी
१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याची
सूत्रे आपल्या हातात घेतली. याचाच
परिणाम या स्वातंत्र्यलढ्यात
हिंदू-मुस्लीम बांधवांचे ऐक्य
झाल्याचे दिसून येते.
कुंवरसिंह व मुघल सेनापती बख्तखान या
नेत्यांची कामगिरी
महत्त्वाची आहे. दिल्ली, कानपूर, लखनौ, झाशी येथील व
पश्चिम
बिहारच्या भागातील लढ्याचे स्वरूप
विशेष उग्र होते. दिल्लीच्या
रक्षणाची जबाबदारी बख्तखान याने आपल्या
शिरावर घेतली. दिल्ली
हस्तगत करण्यासाठी इंग्रजांनी आपली
सर्व शक्ती पणाला लावली.
सप्टेंबर १८५७ मध्ये इंग्रजांनी
दिल्लीचा ताबा घेतला. बहादुरशाहा
यांना कैद केले व त्यांच्या मुलांची
हत्या केली.
पश्चिम बिहारमध्ये जगदीशपूरचे जमीनदार
कुंवरसिंह हे लढ्यात
उतरले. रोहिलखंडात मौलवी अहमदउल्ला
यांनी लोकांना इंग्रजांविरुद्ध
लढण्यास प्रेरणा दिली.
बीमोड : स्वातंत्र्य योद्धे व त्यांचे
नेते प्राणांची पर्वा न करता
इंग्रजांविरुद्ध लढले; परंतु अचानक सुरू
झालेल्या लढ्याच्या पहिल्या
धक्क्यातून इंग्रज लवकरच सावरले.
पुढील सहा महिन्यांतच संघर्षाचे
स्वरूप पालटले. हातून गेलेली सर्व
महत्त्वाची ठिकाणे इंग्रजांनी परत
मिळवली. राणी लक्ष्मीबाई, कुंवरसिंह, अहमदउल्ला हे
धारातीर्थी पडले.
बहादुरशाहांना रंगून येथे बंदिवासात
ठेवण्यात आले. नानासाहेब व बेगम
हजरत महल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला.
तात्या टोपे मात्र सुमारे दहा
महिने इंग्रजांविरुद्ध लढत राहिले; परंतु फितुरीमुळे
ते इंग्रजांच्या हाती
पडले. त्यांना इंग्रजांनी फासावर
चढवले. अशा रीतीने सन १८५८ च्या
अखेरीपर्यंत इंग्रजांनी हा लढा
कठोरपणे दडपून टाकला.
लढ्याचे स्वरूप : १८५७ च्या या लढ्याची
सुरुवात हिंदी
सैनिकांमधील असंतोषाच्या उद्रेकाने
झाली. पुढे त्यात शेतकरी,
कारागीर वगैरे सामान्य लोकही सामील
झाले. तसेच काही जमीनदार व
राजेरजवाडेही त्यात सहभागी झाले.
इंग्रजांच्या जाचक वर्चस्वातून मुक्त
होण्यासाठी भारतीयांनी केलेला हा
सशस्त्र संग्राम होता. या लढ्यात हिंदू
व मुसलमान, भिन्न जातीजमाती, अमीर-उमराव व
सामान्य लोक यांचा
सहभाग होता. इंग्रजांचे भारतातून
उच्चाटन करणे हे त्यांचे समान ध्येय
होते. त्यामुळे या लढ्याला व्यापक
राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले.
१८५७ चा लढा मोठ्या प्रमाणावर अपयश का आले ?
एकसूत्रता झाला; परंतु इंग्रजी सत्ता नष्ट झाली नाही, कारण लढ्यामध्ये
नव्हती. एककेंद्री नेतृत्व नव्हते.
तसेच लढणाऱ्यांजवळ पुरेशी शस्त्रास्त्रे
नव्हती. सुशिक्षित भारतीय व बहुसंख्य
संस्थानिक लढ्यापासून अलिप्त
राहिले. याउलट इंग्रजांजवळ एककेंद्री
नेतृत्व होते. शिस्तबद्ध सैन्य होते.
अद्ययावत शस्त्रास्त्रे होती. अनुभवी
सेनानी होते. दळणवळणाचे नियंत्रण
त्यांच्या हाती होते. त्यामुळे
त्यांच्यापुढे भारतीयांचा निभाव लागला नाही.
१८५७ चा लढा अयशस्वी ठरला असला, तरी त्यांच्यातील
हुतात्म्यांचे हौतात्म्य वाया गेले
नाही. हा लढा भारतीयांना पुढे प्रेरणादायी
ठरला. या लढ्यामुळे इंग्रज सत्ता
हादरली.
परिणाम : १८५७ च्या लढ्याचे फार
दूरगामी परिणाम झाले.
इंग्रजी सत्तेविरुद्ध भारतीयांमध्ये
असलेल्या असंतोषामुळे हा लढा झाला
याची जाणीव इंग्लंडच्या
राज्यकर्त्यांना झाली. भारतातील इंग्रजी सत्ता
कंपनीच्या हाती सुरक्षित नाही, अशी त्यांची पक्की
धारणा झाली, म्हणून
त्यांनी १८५८ साली एक कायदा करून ईस्ट
इंडिया कंपनीची भारतातील
सत्ता संपुष्टात आणली. भारताचा कारभार
ब्रिटिश पार्लमेंटने आपल्या
हाती घेतला.
राणीचा जाहीरनामा : इंग्लंडची राणी
व्हिक्टोरिया हिने भारतीयांना
उद्देशून नोव्हेंबर १८५८ मध्ये एक
जाहीरनामा काढला. सर्व भारतीय
आपले प्रजाजन आहेत. वंश, धर्म, जात किंवा
जन्मस्थान यांवरून
प्रजाजनांत भेदभाव केला जाणार नाही, शासकीय नोकऱ्या
देताना
गुणवत्ता हाच निकष राहील असे राणीने
जाहीर केले. भारतीयांच्या
धार्मिक बाबतींत सरकार हस्तक्षेप
करणार नाही असेही आश्वासन दिले.
भारतीय संस्थानिकांशी इंग्रजांनी
केलेले करार पाळले जातील, कोणतेही
संस्थान यापुढे खालसा केले जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही
राणीच्या
जाहीरनाम्याने दिली.
लष्कराची पुनर्रचना : भारतातील इंग्रज
लष्कराची पुनर्रचना
करण्यात आली. युरोपीय सैनिक आणि
अधिकारी यांच्या संख्येत वाढ
करण्यात आली. भारतीय सैनिकांच्या
पलटणी जातीनिहाय करण्यात
आल्या. तोफखाना हा पूर्णपणे इंग्रज
अधिकाऱ्यांच्या ताब्यात ठेवण्यात
आला. हे सर्व करण्यामागे भारतीय सैनिक
एकत्र येऊ नयेत व त्यांनी पुन्हा
असा लढा उभारू नये, हा इंग्रजांचा हेतू
होता.
धोरणात्मक बदल : १८५७ नंतर
ब्रिटिशांनी आपल्या अंतर्गत
धोरणातही बदल केले. भारताच्या सामाजिक
बाबतींत ढवळाढवळ
करायची नाही, असे धोरण त्यांनी
स्वीकारले. त्याचबरोबर भारतीयांची
सामाजिक एकजूट होऊ नये म्हणून ब्रिटिश
शासन प्रयत्नशील राहिले.
'फोडा आणि राज्य करा' या नीतीचा वापर करून भारतातील
साम्राज्य
जास्तीत जास्त दृढ करण्यावर त्यांनी
भर दिला.
भारतीयांवरही या लढ्याचा खोलवर परिणाम
झाला. प्रादेशिक
निष्ठांच्या जागी राष्ट्रीय भावनेचा
उदय होऊ लागला. ब्रिटिशांशी लढा
देण्यासाठी वापरलेले मार्ग निरुपयोगी
ठरल्यामुळे नवे मार्ग शोधण्याची
गरज भारतीयांना जाणवू लागली. १८५७ चा
स्वातंत्र्यलढा हा भारताच्या
स्वातंत्र्य चळवळीचे प्रेरणास्रोत
ठरला.