उदासीनतेचे परिणाम

 

उदासीनतेचे परिणाम

उदासीनतेचे परिणाम

कोणत्याही संकटात सदा हसतमुख राहणारी व्यक्ती, प्रसंग कुठलाही असो,

प्रसन्नपणे आल्या प्रसंगाला तोंड देणारी व्यक्ती ही स्वतः दुःखी आणि निराश

राहत नाहीच; पण दुसऱ्यालाही आनंद देते. या त्यांच्या आनंदी असण्याने त्यांना

स्वत:लाच फक्त आनंद मिळतो असे नाही, तर जे लोक निराशेच्या गर्तेत सापडले आहेत,

स्वत:ला एकाकी समजतात, अशा लोकांसाठी एक प्रेरणास्थान बनतात. कितीही

प्रतिकूल परिस्थिती आली, आयुष्याचे फासे उलटे पडले तरी यांच्या चेहऱ्यावरचे हास्य

कधी मावळत नाही. अशी व्यक्ती म्हणजे एक अफलातून व्यक्तिमत्त्व असते. असा माणूस सर्वसाधारण नसतो. जग जिंकल्याचा त्यांचा आविर्भाव असतो. जेथे जातात तेथे प्रसन्नताच

पसरवतात.

काही व्यक्ती केवळ दरिद्री, कंगाल म्हणूनच दुःख उपभोगण्यासाठी जन्माला आलेल्या असतात, असं सुप्रसिद्ध इंग्रजी विचारवंत कार्लाईल यांचं म्हणणं. असे लोक आपल्या आयुष्यातील

प्रत्येक गोष्टीबद्दल उदासीन असतात. त्यांना संसारातल्या कुठल्याच विषयात गोडी वाटत नाही. आपले कामही ते मनापासून करत नाहीत. त्यांच्याकडे आत्मविश्वास नावाची गोष्टच नसते. असे

लोक आळशी बनतात. त्यांचा स्वत:वरही विश्वास नसतो आणि दुसऱ्यांवरही विश्वास नसतो. त्यांच्यासमोर कोणताही आदर्श नसल्याने आनंद,

सुख, प्रसन्नता त्यांच्या बाजूलाही फिरकत नाही. जिथे जातील तिथे हे लोक दुःख,

पीडा, कष्टच बरोबर घेऊन जातात. अशा व्यक्ती एक प्रकारचं मानसिक विषच

समाजात पसरवत असतात. त्यांच्या सान्निध्यात येणाऱ्या लोकांमध्ये निराशाजनक,

नकारात्मक विचारांचा प्रसार करतात. बाकीच्यांना आपल्या उदासीची शिकार

बनवतात. आनंद नावाची चीज आपल्यासाठी बनलीच नाही असा त्यांचा दृढविश्वास

असतो. त्यामुळे त्यांच्या मनावरची उदासीची छटा जात नाही किंवा कमी होत नाही.

अशा व्यक्ती नेहमी निराशच असतात.

परंतु, वास्तवात हे काही खरं नाही. या जगात कुणीही निराश राहायला किंवा

दुसऱ्यांचा आनंद हिरावून घ्यायला जन्माला आलेला नाही. कोणीही दुःखी, दरिद्री

राहण्यासाठी आलेला नाही. आपण जन्माला घातलेल्या सगळ्या सजीव सृष्टीने

प्रसन्न राहावे, आनंदी राहावे अशीच ईश्वराची इच्छा असते. आता तुम्ही मला

सांगा की, तुम्ही सतत उदास राहणं, भीती, संशय, निराशा यांच्या विचारांनी ग्रासलेलं

राहणं, असं राहणं याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला? वास्तव हेच आहे की,

दुसऱ्याला जखमी करण्याचा, मारण्याचा ज्याप्रमाणे तुम्हाला अधिकार नाही, तसाच

लोकांच्या आनंदावर विरजण घालण्याचाही तुम्हाला अधिकार नाही किंवा दुसऱ्याचे

सुख, आनंद, प्रसन्नता यांच्यावर अतिक्रमण करण्याचाही अधिकार नाही.

या जगात निराश आणि उदासीन होऊन निष्क्रिय बसलेले अनेक लोक आहेत.

ते सतत आपल्या दु:खाचे, कमनशिबाचे, कष्टांचे रडगाणे गात बसतात. मी दुर्दैवी,

दुःखी आहे, त्रासलेला आहे अशीच त्यांची मनोधारणा असते. माझ्या नशिबात

सुख जराही नाही. परमेश्वराची माझ्यावर कृपादृष्टीच नाही हा त्यांचा आक्रोश असतो.

असे लोक आजूबाजूला असणे म्हणजे प्रसन्न वातावरणात, दुधात मिठाचा खडा

टाकावा तसं त्यांचं व्यक्तिमत्त्व असतं. निराशेच्या विचारांमुळे त्यांची दु:खाची मुळे

खोलखोल जातात. असे लोक तुम्हाला पदोपदी भेटतील. तुम्ही जर उत्साही आणि

प्रसन्न असलात तर अशा माणसांच्या सहवासात तुमचं मन खिन्नच होईल. अशा

लोकांची संगत टाळा.

माझ्या परिचयात एक व्यक्ती आहे. ती व्यक्ती नेहमी निराश असायची. उदासीन

असायची. जिथे जिथे ती व्यक्ती जाईल, तिथे तिथे निराशा तिची पाठ सोडत नसे.

तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर कुणालाही वाटावं की, सगळ्या जगाचं दु:ख याच्याच

डोक्यावर आहे. समोरच्या व्यक्तीला त्याच्यासमोर हसायचं म्हणजे चोरी केल्यासारखं

वाटायचं. तुम्ही अशा एखाद्या व्यक्तीच्या सहवासात कधी ना कधी नक्कीच आला

असणार. अशा व्यक्तीसमोर तुम्ही उत्साहाने कसे जाणार? कारण अशी व्यक्ती

समोर आल्यावर तिचा उदासीन चेहरा आणि निर्जीव बोलणं यामुळे तुम्हाला पुढे

बोलायला उत्साह राहणार नाही. ती व्यक्ती समोर आल्यावर मला स्वच्छ

सूर्यप्रकाशातून अंधारात ढकलल्यासारखं वाटत असे. महत्त्वाचा मुद्दा असा की,

परमात्म्याने आपल्याला या सुंदर धरतीवर कशाला पाठवलंय? या निसर्गसौंदर्याचा

आस्वाद घ्यायला, प्रसन्न राहायला आणि बाकीच्यांनाही आनंदी ठेवायला. तसेच

उदासी आणि निराशेपासून दूर राहायला.

इमर्सन यांचं म्हणणं असं की, सुस्मित मुख, आनंदानं भरलेला चेहरा हेच

आपल्या मानसिक प्रगतीचं आणि सभ्यतेचं द्योतक आहे. एखाद्या माणसाची प्रसन्न

मुद्रा, त्याच्या चेहऱ्यावरची शांती पाहिली की, आपल्याही मनात दिव्य भाव जागृत

होतो. अशा माणसाला पाहून वाटतं की, याचं व्यक्तिमत्त्व ईश्वराशी किती तादात्म्य

पावलेलं आहे. जिथे जिथे जाईल, तिथे तिथे आपल्या स्वभावाने सकारात्मक भाव

तो निर्माण करतो. आनंद, उत्साह, आशा आजूबाजूच्या वातावरणात भरून राहते;

पण अशा व्यक्तींची संख्या दुर्दैवाने खूप कमी आहे.

जीवनातला प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी आनंदाचे निधान घेऊन येत

असतो. उगवत्या सूर्याबरोबर प्रत्येक दिवस नवीन नवीन स्वप्नं घेऊन येत असतो.

त्यामुळे दिवसाचे स्वागत आनंदाने करा, कारण दिवसातला प्रत्येक क्षण

तुमच्यासाठी संधी घेऊन येत असतो. प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने

पाहिले तर पदरी निराशा कधीच येत नाही. म्हणूनच योग्य विचार मनात रुजवा.

त्याला तुमच्या सृजनशील विचारांचे खतपाणी घाला. तुम्हाला नवनिर्मितीचा

आनंद खचितच मिळेल. हसतमुखाने केलेली गोष्ट तुम्ही यशस्वीरीत्या पूर्ण

करू शकता. म्हणूनच ताजेतवाने होऊन कामाला लागा. मनाला आलेली

नैराश्याची मरगळ झटकून कामाला लागा. मनाची प्रसन्नता जेव्हा कामात

उतरते, तेव्हा ते काम चांगलेच होते. त्यामुळे तुम्ही प्रफुल्लित अंत:करणाने

नवीन आव्हानांना सामोरे जाऊ शकता. मग संकटेच आपल्याला वाट दाखवतील

आणि यशाचा मार्ग सुकर होईल.

सकाळी उठल्याबरोबर तुम्ही दिवसाचे ध्येय ठरवा. खोल श्वास घेऊन, मनात

आत्मविश्वास येऊ द्या आणि ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू करा. अथक परिश्रम

  करण्याची मानसिक तयारी ठेवा. एक विशिष्ट कामच माझे, बाकीचे मी करणार

नाही, हा दुराग्रह बाळगू नका. मन लावून प्रामाणिकपणे काम केले तर तुमचे ध्येय

हाकेच्या अंतरावर दिसेल. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक सुप्त ऊर्जा, कला असते. ती

ऊर्जा बाहेर येऊ द्या. तुमच्या आतील कला, गुण प्रकट झाले की,

आत्मविश्वास वाढेल. मन शांत, प्रसन्न ठेवून काम केल्यावर तुमचे ध्येयाचे चित्र

स्पष्ट दिसेल. विशेषतः लहान मुलांना जर वेगवेगळ्या कृती करायला सांगितल्या

(activities) तर त्यामधून त्या मुलाच्या आवडीची एक तरी कला निघतेच. त्यामध्ये

सातत्य ठेवलं तर त्यात मूल पारंगत होतं.

सभ्य जगात उदास आणि निराश व्यक्तीला काही महत्त्व नाही. प्रत्येकजण

अशा व्यक्तीपासून दूरच राहायचा प्रयत्न करतो. उदास, शंकित मनामुळे आजारच

वाढतात. कारण निराशा रोगप्रतिकारक शक्तीच्या मार्गातील धोंड बनते. खरं तर

अध:पतन आणि उदासी यांसारखी भयंकर गोष्ट जगात दुसरी नाही. निराश आणि

उदास वातावरणात जर उत्साही मनुष्य गेला तर तो वातावरण आपल्यासारखे म्हणजेच

उत्साहाच्या सुगंधाने भरून टाकतो. त्या वातावरणात बसलेल्या खिन्न लोकांच्या

चेहऱ्यावर मंद हास्य फुलते. त्याच्या नुसत्या दर्शनानेच लोकांमध्ये उत्साहाचे तरंग

उठतात. बऱ्याच लोकांच्या अपयशाचं कारण म्हणजे त्यांचा आपल्या मनावर ताबा

नसतो. भावनांचे ते गुलाम होतात. मुळात मनुष्य हा उदासी, नैराश्य यांच्यापासून दूर

जाऊ पाहत असतो. जे लोक आनंदी Happy go lucky असतात, अशांकडे

माणसांचा ओढा असतो. कुटुंबातली एक जरी व्यक्ती उदास असेल तर सगळं

कुटुंब उदास होतं. अशी दु:खी व्यक्ती स्वत:ही दुःखात बुडते आणि बाकीच्यांनाही

आनंदात राहू देत नाही.

माणसासारखा बुद्धिमान, शक्तिमान प्राणी आपल्या ताकदीने जग जिंकू शकतो.

तो काय असा निराश राहायला जन्माला आला आहे का? ज्याच्याकडे हजारो

लोकांना दिशा दाखवण्याची कुवत आहे, शेकडो लोकांना जो काम देऊ शकतो तो

अशा प्रकारच्या मानसिक जंजाळात सापडतो, हे आश्चर्य नाही का? जगात अशी

कितीतरी माणसं आहेत जी महत्त्वाकांक्षी आहेत; पण पुढे जाऊ शकत नाहीत.

कारण माहीत आहे? ती मनाने नेहमी मरगळलेली असतात. माझ्या माहितीतली

एक व्यक्ती आहे, जी मनाची खूपच गुलाम आहे.